पुणे – प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही.
रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक आणि समतोल आहार हा संकल्पना निदान ह्या वेळच्या जेवणात तरी प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा गृहिणी वर्गाचा कटाक्ष असतो.
कितीही आवडीचे आणि आग्रहाचे असले तरी रात्रीचे जेवण घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आरोग्यदृष्ट्या फार महत्त्वाचे असते.
रात्रीच्या जेवणात पोळी ऐवजी भाकरीचा पर्याय निवडावा
सततच्या वरण भाताचे जागी मुगाची खिचडी, मसाले भात हे पर्याय निवडावेत.
फळभाजा आणि पालेभाज्यांची अदलाबदल करीत राहावे.
ज्या व्यक्तींना दही, दूध, ताक, खाण्याची सवय आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात शेवटचा भात हा आमटी भात न खाता तो ताक भात दही भात कढी भात खावा. दूध भात हा तर अधिक उत्तम.
रात्रीचा आहार हा दोन घासांची भूक राखूनच घ्यावा.
रात्रीच्या जेवणानंतर पचनास मदत करणारी सुपारी, बडीशेप, सुपारी, विनासुपारी पान, आवळा सुपारी ह्या सारख्या पाचक वस्तूंचा वापर करावा.
जेवणानंतर लगेच न झोपता थोडी शतपावली करावी वा चक्क फिरून यावे.
जेष्ठ व्यक्तींनी आपापल्या क्षमतेनुसार तसेच आवड आणि गरज ह्यानुसार हा आहार घ्यावा. ज्या पदार्थांच्या सेवनाने आपल्याला त्रास होईल असे पदार्थ खाणे टाळावे.
तसेच आहार हा फारच कमीही घेतला जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कारण प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी घेतलेला आहार आपल्या झोपेवर परिणाम करतो हे विसरू नये.
रात्रीचे जेवण घेताना पचनास जड असणारे पदार्थ न खाणेच हिताचे असते. रात्री जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
रात्रीच्या जेवणाची वेऴसुद्धा निश्चित करून ती फार मागे पुढे होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
तसेच आरोग्याचा विचार करता कोणीही अनावश्यक असे जागरण करू नये.
आपणच आपल्या खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली, खबरदारी पाळली तर आपलेच आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल हे विसरून चालणार नाही.
भोजनोत्तर फिरणे…
संध्याकाळच्या फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने निवृत्त मंडळी, ज्येष्ठ नागरिक, ह्यांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या दृष्टीने तोच एक शारीरिक आणि मानसिक उत्साह ताकद आणि ऊर्जा देणारा एक सोपा उपाय असतो. संध्याकाळच्या फिरण्यात सकाळच्या फिरण्याइतकी जलदगती नसते किंवा ती अभिप्रेतही नसते. सकाळचे चालणे हे जलदगतीचे असायला हवे, तर संध्याकाळचे चालणे हे मध्यम गतीचे सुखकारक आणि अवतीभवतीचा अस्वाद घेत घेत चालणे होय.
साधारणपणे अशा फिरण्यासाठी लोक सहसा एकटे दुकटे न जाता चार चौघांच्या समुहाने फिरायला जातात. अशा संध्याकाळच्या फिरण्याचे अनेक शारीरिक वैयक्तिक आणि कौटुंबिक फायदे आहेत. अर्थात ते लक्षात घेऊन त्यानुसार ते अंमलात आणणेही तितकेच गरजेचे असते.