पुणे – सर्दी झाली की माणूस हैराण होतो. काही सूचत नाही. खरं म्हणजे सर्दी हा काही गंभीर आजार नाही. सर्दीवर औषधांचीही काही कमी नाही. सर्दी हा नाक, घसा, श्वासनलिका ह्या सर्वांवर आक्रमण करणारा एक सर्वसामान्य संसर्गजन्य विषाणू आहे. सर्दीचे जंतू खूपच संसर्गजन्य असतात. जेव्हा सर्दी झालेला एखादा माणूस खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ह्या जंतूंचा हवेतून प्रादुर्भाव होतो.
हा प्रादुर्भाव सर्दी झालेल्या माणसाचा रुमाल, टॉवेल वापरल्याने आणि त्या माणसाच्या जवळपास वावरल्याने सुद्धा सर्दी होते. परंतु लहान मुलांमधे त्याचे प्रमाण जास्त दिसते. ह्याचे कारण म्हणजे मोठ्या माणसांची प्रतिकार शक्ती (इम्युन सिस्टीम) ही लहान मुलांपेक्षा प्रबळ असते. आणि सर्दीच्या जंतुंसाठी तर जास्तच.
सर्दी ज्या जंतुंमुळे होते त्याला हायनोव्हायरस म्हणतात. हा जंतू श्वासातून आणि हवेतूनच पसरत असल्यामुळे सर्दीची लागण गर्दीच्या ठिकाणी जास्तीतजास्त होते. गर्दीतून लोकल मधून किंवा बस मधून प्रवास करत असताना, किंवा लहान मुलांच्या प्ले-ग्रूप सेंटरमधे, शाळांमधे, पाळणाघरांमधे जास्तीत जास्त लागण होताना दिसते.
एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला सर्दी होऊ नये ह्यासाठी काळजी घ्यायचे अनेक मार्ग असतात. आपल्याला झालेली सर्दी इतरांपर्यन्त न जाण्यासाठी शिंकताना/खोकताना तोंडासमोर रुमाल धरा. अधुन मधुन साबणाने स्वत:चे हात धुवा. दुस-या व्यक्तीशी खूप जवळून बोलायचे टाळा. निरोगी माणसांनीसुद्धा सर्दीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काळजी घ्यायला हवी. घरातल्या कुणाला जर सर्दी झाली असेल तर त्याच्या पासून थोडे अंतर ठेवलेलेच बरे. सर्दीसाठी आजीबाईंचा बटवा मोठा उपयुक्त असतो. आजीबाईच्या बटव्यातील ही साधीसुधी,
सहजपणे- बहुदा घरातच उलपब्ध असणारी ही घरगुती औषधे मोठी परिणामकारक असतात.
दूध आणि हऴद-हळद ही अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल असते. ती सर्दीखोकल्याशी लढण्यास मदत करते. गरम पाणी किंवा दुधात-दुधात अधिक चांगले-एक चमचा हळद घालून प्यायली असता. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. दूध आणि हळदीचा हा उपाय केवळ लहान मुलांसाठीच नाही, तर मोठ्या माणसांसाठीही उपयुक्त आहे,
आल्याचा चहा-आल्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दीखोकला झाला असता त्वरित आराम देतो. सर्दीखोकला वा ताप असेल तर आले चांगले बारीक किसावे आणि त्यात कपभर पाणी वा दूध मिसळून काही वेळ चांगले उकळावे, नंतर ते प्यावे. आपल्या रोजच्या चहात, चहा करत असताना आले किसून घातले तरी त्याचा परिणाम होतो. मात्र आले ताजे असावे.
लसणामध्ये एलिसिन नावाचे एक रसायन असते. हे एलिसिन नावाचे रसायन अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरल आणि अँटि गंगल असते. लसणाच्या चारपाच पाकळ्या तुपात भाजून घ्याव्यात. या तुपात भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या असता सर्दीखोकल्यावर परिणामकारक होतात. दिवसातून एकदोन वेळा तरी असा तुपात भाजलेला लसूण खावा. लसूण सर्दीखोकल्याचा प्रभाव झपाट्याने कमी करतो,
तुळस आणि आलं – सर्दी आणि खोकल्यासाठी तुळशीची पाने आणि आलं यांचा उपाय अगदी रामबाण समजला जातो. अगदी सोपा असलेल्या या उपायात एक कपभर गरम पाण्यात तुळशीची चारपाच पाने घालावीत, त्यातच आल्याचा एक छोटासा तुकडा टाकावा. हे मिश्रण चांगले उकळून घेऊन त्याचा काढा करावा. कपभर पाणी आटून अर्धा कप झाले, की हा काढा घ्यावा. त्वरित गुण येईल. लहानांप्रमाणेच मोठ्यांसाठीही हा उपाय रामबाण आहे.