आई-वडिलांना खात्री होती या परीक्षेत त्याला 90 % पेक्षा जास्त मार्क मिळणार कारण, फायनल असल्यामुळे त्या दोघांनी शुभमचा अभ्यास, आरोग्य, जेवण या साऱ्यात जातीने लक्ष घातलं होतं. प्रसंगी ऑफिसमध्ये रजा घेऊन त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं होतं. त्याला हव नको ते सारं पुरवलं होतं, पण निकाल लागला आणि या साऱ्यावर पाणी पडलं. शुभमचा निकाल पाहून त्याचे वडील प्रचंड चिडले. इतके की त्यांचा राग अनावर झाला आणि ते शुभमला नको नको ते बोलले. आईच्या निष्काळजीपणावरही रागाच्या भरात ताशेरे ओढले. आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शुभम कसा अपयशी ठरला याचं मोठं ओझं त्याच्या डोक्यावर त्यांनी लादलं आणि ते तिथून निघून गेले.
शुभमचा इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागला आणि तो पाहून त्याच्या आई-बाबांना मोठा धक्काच बसला. नेहमी पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये झळकणारा, कायम 85 ते 90 टक्के मार्क मिळवणारा शुभम इंजिनिअरिंगमध्ये नापास झाला होता. त्याचे 3/4 विषय राहिले होते. तो रिझल्ट घेऊन घरी आला आणि क्षणात घरातले चित्र पालटून गेले. आई-वडिलांना खात्री होती या परीक्षेत त्याला 90 % पेक्षा जास्त मार्क मिळणार कारण फायनल असल्यामुळे त्या दोघांनी शुभमचा अभ्यास, आरोग्य, जेवण या साऱ्यांत जातीने लक्ष घातलं होतं. प्रसंगी ऑफिसमध्ये रजा घेऊन त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं होतं. त्याला हवं नको ते सारं पुरवलं होतं, पण निकालामुळे या साऱ्यावर पाणी पडलं.
शुभमचा निकाल पाहून त्याचे वडील प्रचंड चिडले. इतके की त्यांचा राग अनावर झाला आणि ते शुभमला नको नको ते बोलले. आईच्या निष्काळजीपणावरही रागाच्या भरात ताशेरे ओढले गेले, आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शुभम कसा अपयशी ठरला याचं मोठं ओझं त्याच्या डोक्यावर त्यांनी लादलं आणि ते तिथून निघून गेले. त्याची आई वडिलांएवढी चिडली नसली तरी तिच्या बोलण्याचा रोखदेखील अपेक्षाभंगाकडे होता. या साऱ्या प्रसंगामुळे शुभम काहीसा गडबडून गेला. एकदम शांत झाला. पण त्याचा हा गोंधळ, ताण आणि आलेल्या अपयशाचं वैफल्य केवळ त्या दिवसापुरतंच टिकलं. दुसऱ्या दिवशी तो अगदी नॉर्मल होता. मस्त टीव्ही पाहत, गाणी ऐकत, गेम्स खेळत, मित्रांबरोबर गप्पा मारत त्याने आपला वेळ घालवला, पुढचे 2-4 दिवसही त्याने असेच घालवले. आई-वडिलांना त्याचे हे वागणे अनपेक्षित आणि विचित्र वाटले त्यामुळे पुन्हा ते दोघे त्याला खूप रागावले. ताबडतोब अभ्यास सुरू करायला सांगितला आणि या परीक्षेत चांगलेच टक्के मिळायला हवेत अशी सक्त ताकीदही दिली.
शुभमने त्यावर केवळ होकारार्थी मान हलवली. काही न बोलता तो स्वत:च्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने आई त्याच्या खोलीत गेली तर शुभम झोपला होता. हे पाहून आईला खूप राग आला. तिने त्याला रागारागाने उठवले आणि हातात पुस्तक आणून दिले. हे सारं घडेपर्यंत शुभम अगदी शांत होता. पण आईने हातात पुस्तक दिल्यावर तो प्रचंड चिडला. त्याने ते पुस्तक फेकून दिले आणि आईवर ओरडला, मला आता काही शिकायचं नाही. मी अभ्यास करणार नाही असं म्हणून घरातून रागारागाने बाहेर पडला तो थेट रात्रीच घरी परत आला. आई-वडिलांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते बोलायला लागले की तो उठून घराबाहेर निघून जायचा. त्याच्या या वागण्याने आई-बाबा घाबरून गेले आणि काय करावे हे न समजल्याने भेटायला आले. घडलेले सर्व सांगताना आईला रडू आले. त्याच्या चिंतेने आईला रडू येत होतं. त्यांना शांत करून शुभमला भेटायला पाठवायला सांगितले. त्याप्रमाणे दोन दिवसांनी शुभम भेटायला आला.
आल्यावर त्याने स्वत:ची ओळख करून दिली. ओळख झाल्यावर व संवाद साधल्यानंतर त्याला भेटीमागचा उद्देश सांगितला व त्याच्या बरोबर संवाद साधायला सुरुवात केली. तो देखील अतिशय मोकळेपणाने बोलत होता. संवाद साधताना असे लक्षात आले की, शुभमच्या वडिलांचा स्वभाव तापट आणि हुकुमशाही/ अधिकारवादी आहे. त्यांनी आत्तापर्यंत नेहमीच शुभमला स्वत:च्या मतांप्रमाणे व अपेक्षांप्रमाणे वागायला लावले होते. छोट्या छोट्या गोष्टीही ते नेहमी त्याला व आईलाही स्वत:च्या मनाप्रमाणे करायला लावतात. आणि त्यांचं ऐकलं नाही की आईशी वाद घालतात किंवा शुभमला सतत ओरडतात. प्रत्येक लहान-मोठी गोष्ट त्यांच्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे हा त्यांचा हट्ट असतो.
शुभमला खरं तर फोटोग्राफी आणि संगीतामध्ये खूप रस होता. त्याला त्यातंच आपलं करिअर करायचं होतं. पण वडिलांनी त्याचं काहीही न ऐकता त्याला इंजिनिअरिंग करायला लावलं. हा सारा राग मनात धरून शुभमने मुद्दामच परीक्षेदरम्यान अभ्यास न करता नापास व्हायचं हा उपाय शोधून काढला व तसंच केलं. हे लक्षात आल्यावर या संदर्भात त्याला आवश्यक मार्गदर्शन करून वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रोत्साहित केलं.
यानंतर त्याच्या आईवडिलांची भेट घेऊन सत्य परिस्थितीची तसेच त्याच्या परिणामांची जाणीव करून दिली. अर्थात वडिलांच्या स्वभावदोषामुळे आपले वर्तन मान्य करणे व त्यात बदल करणे यासाठी वेळ लागला. सुरुवातीला काहीसा विरोधही झाला, पण समुपदेशन सत्रानंतर त्यात बदल घडत गेला. त्यामुळे घरातले वातावरण, नातेसंबंध यात आपोआपच सुधारणा झाली. त्यामुळे शुभमने इंजिनिअरिंग पूर्ण केल आणि सध्या तो फोटोग्राफीचे शिक्षण घेतो आहे.