वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या विकारावर विशिष्ट औषध कामी येतंय, असं लक्षात आल्यास त्यावरच भर दिला जातो; परंतु कालांतरानं त्या आजाराचे जंतू त्या औषधालाही जुमानत नाहीत, असं दिसून येतं. अँटिबायोटिक्सच्या वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. त्याविषयी..
आजवर विविध प्रकारच्या उपचार पद्धतीच्या सहाय्यानं व्याधींवर मात करण्याचे तसंच रोगाच्या प्रसाराला आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले. अलीकडे तर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली आहे. त्यामुळे दुर्धर आजारावरील प्रभावी उपचार पद्धती अस्तित्वात आणणं शक्य होत आहे. अशा तऱ्हेनं अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याद्वारे तत्कालीन आजारांबाबत रुग्णांना दिलासा मिळणं शक्य झालं. काही संसर्गजन्य विकार तर ब-याच प्रमाणात आटोक्यात आले. देवीसारख्या विकाराचं तर समूळ उच्चाटन करण्यात यश आलं. त्यावेळी विविध ठिकाणी देवी रोगी कळवा, हजार रुपये मिळवा असं लिहिलेले फलक जागोजागी आढळत. परंतु आता या रोगाचं कोठे नावही दिसत नाही.
अर्थात, याचं श्रेय वैद्यकीय संशोधनाला जातं. अनेक संशोधकांनी अथक परिश्रमातून विकारांवर मात करणारी प्रणाली शोधून काढली. आजही विविध विकारांबाबतचं संशोधन सुरू आहे. याचा अर्थ वैद्यकीय क्षेत्रासमोर सतत कोणत्या ना कोणत्या विकारावर मात करण्यासाठी उपचार शोधण्याचं आव्हान कायम आहे. बदलत्या काळानुरूप काही नवे विकार डोकं वर काढत आहेत. सद्य:स्थितीत मधुमेह, हृदयविकार यांचं वाढतं प्रमाण हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. या मागील कारणांबाबत वेळोवेळी चर्चा केली जाते. ती कशी दूर करावीत हेही सांगितलं जातं. दुसरीकडे या विकारांवर वेळीच कशी मात करता येईल, याबाबतचं संशोधनही अव्याहतपणे सुरू आहे. परंतु या विकारांच्या प्रसाराला पुरेशा प्रमाणात अटकाव करता आलेला नाही.
वैद्यकीय क्षेत्रासमोरील आणखी एक आव्हान म्हणजे ठरावीक उपचारांचा त्या त्या विकाराच्या जंतूंवर प्रभाव कमी होत जाणं. एखाद्या विकारावर विशिष्ट औषध कामी येतंय, असं लक्षात आल्यावर त्यावरच भर दिला जातो. परंतु कालांतरानं त्या आजाराचे जंतू वा विषाणू या औषधालाही जुमानत नाहीत, असं दिसून येतं. साहजिक त्या आजारावर आधीची औषधं प्रभावहीन ठरू लागतात. अशा परिस्थितीत रुग्णांना कोणती नवी औषधं द्यायची, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. यातून एक निष्कर्ष समोर येतो, तो म्हणजे एखाद्या आजाराचे जंतू त्याच त्या प्रकारच्या औषधाला सरावतात. त्या औषधाचा प्रतिकार करण्याची शक्ती ते आपल्या ठायी निर्माण करतात.
त्यामुळे त्या औषधाच्या वापरानं संबंधित विकारावर मात करता येत नाही, असं दिसून येतं. काही विशिष्ट औषधांबाबत ही परिस्थिती हमखास निर्माण होत आहे. त्यामुळे आता उपचारात विशिष्ट औषधांचा अधिक काळ वापर करणंही कठीण झालं आहे.
या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही संशोधनांमधून अँटिबायोटिक्सच्या वापराचे दुष्परिणाम मोठया प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्स शक्य तितकी टाळली पाहिजेत आणि योग्य वेळी, आवश्यक रुग्णांना तज्ज्ञांनीच ती लिहून द्यावीत अशी चर्चा सुरू आहे. जगातील अनेक रुग्णालयांच्या मूत्रविकारतज्ज्ञांनी याविषयी सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
पावसाळ्यात शरीराची स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतात मूत्रविकारग्रस्त रुग्णांचं प्रमाण वाढत असून त्यांच्यावर केलेल्या अँटिबायोटिक्सच्या प्रयोगाला काही बॅक्टेरिया दाद देत नसल्याचं दिसून आल्यामुळे मूत्रिपडाच्या आजारांनी मरण पावणा-यांच्या संख्येत वाढ होत चालल्याचं दिसून आलं आहे. मूत्रमार्गाचा संसर्ग हा कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यापाठोपाठ सर्वसामान्य आजार बनत चालला असून हा बॅक्टेरियाजन्य आजार अनेकांच्या जीवावर बेतू पाहत आहे.
यावर केवळ गोळ्या देऊन उपचार करणं कठीण बनत चाललं असून रुग्णांना इंजेक्शन द्यावीच लागत असल्याचं मूत्रविकारतज्ज्ञांच्या निरीक्षणातून समोर आलं. शिवाय अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या उपचारांमुळे आणि काही वेळा बॅक्टेरियांमधील वाढत्या प्रतिरोधक शक्तीमुळे इंजेक्शनचाही उपयोग होत नसल्याचं दिसून येत आहे. मूत्रमार्गाचा संसर्ग मूत्रिपडांपर्यंत पोहोचून त्यांचे आजार होण्याच्या शक्यता बळावलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी करणं हे जगभरच्या डॉक्टरांसमोरचं मोठं आव्हान आहे.
मूत्रमार्गाच्या संसर्गाचा परिणाम म्हणून मूत्राशय, मूत्रनलिका यासारखे अवयव निकामी होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. अशा वेळी मूत्रिपडाला इजा पोहोचवणारी काही अँटिबायोटिक्स देणं भाग पडत असल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र तीव्र अँटिबायोटिक्सचा सरसकट वापर करणं टाळलं पाहिजे आणि नाईलाज झाला तरच ती वापरावीत.
– नरहरी पाटील