Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहारशास्त्र : कॅन्सरची रूपरेषा

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2019 या दहा वर्षांमध्ये 94 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्‍यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्‍तता करून घेऊ शकतो.

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्‌भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्‍यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात.

पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्‍यकता नसताना होत राहते. या अतिरिक्‍त पेशींचे गाठोडे म्हणजेच अर्बुद किंवा ट्युमर (गाठी) होय. हे ट्युमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन ट्युमर म्हणजे कर्करोगाची गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची गाठ ही सहज काढून टाकता येते. या गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत.

मात्र दुसऱ्या प्रकारात कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्‍तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात.

उदाहरणार्थ, डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींचा कर्करोग तसंच बहुतेक प्रकारचे ल्युकेमिया म्हणजे रक्‍ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथी आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो. या अर्बुद विज्ञानाचा अभ्यास केल्यास निदान आणि उपचाराद्वारे कर्करोग हा आजार बरा होऊ शकतो.

काय टाळाल?
शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधाचे पदार्थासारखे आहार टाळावेत.
अतितेलकट पदार्थ टाळावे.
सकाळी दहा ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हात उभे राहू नये.
मद्यपान टाळावे.
काय करावं

उन्हातून फिरताना मोठी हॅट वापरावी.
उन्हातून जाताना 15 किंवा त्याहून अधिक संरक्षक घटक असलेलेच क्रीम लावावं.
पेरू, द्राक्ष, अननस यासारख्या फळांचा आणि टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अशा भाजांचा तसंच कडधान्याचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात पास्ता, तांदूळ आणि घेवडा अशा पदार्थांचा समावेशक करावा. थोडक्‍यात, तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्‍यता कमी होते.

कॅन्सरची रूपरेषा
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांनाच होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक असून तीन दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास 5 लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, या वर्षी ही संख्या 7 लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्‍यता अधिक आहे. प्रतिवर्षी कर्करोगाने मृत्यू होणाऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच फुफ्फुसं, तोंड, ओठ, घसा आणि मानेचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतड्यांच्या कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या 32 ते 35 या वयोमर्यादेत होतात. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 300हून अधिक कर्करोग निदान संस्था असून त्यापैकी 40 संस्थांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. 2020 पर्यंत भारतात 600 कर्करोग निदान संस्था उपलब्ध असणं गरजेचे आहे.

स्तनांचा कर्करोग
गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेले दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. कारण हा कर्करोग बरा होण्याची शक्‍यता असते. यासाठी नियमित एक तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या 20 वर्षीपासूनच योग्य डॉक्‍टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने एखादीला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हे आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर 28 महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग 43 ते 46 या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कर्करोगाची मदत रुग्णांपर्यंत पोहोचत का नाही?
कर्करोगाचा उपचार करण्यासाठी लागणारा खर्च खूप असल्याने कित्येक दशलक्ष रुग्णांना त्या उपचाराचा लाभ मिळू शकत नाही. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही मोठी खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्‍तता होण्याची शक्‍यतादेखील कमी असते. कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्‍तीचा अभाव हीदेखील असू शकतात. याशिवाय बाह्य आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ, अन्न सवयी, औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात.

निदान करण्यात विलंब, आवश्‍यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा किलर रोग ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्‍यक आहे. मूत्रावाटे रक्त जाणे हे कर्करोगाचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. यावरून हे सिद्ध होतं की कर्करोगावर प्रतिबंध करण्यात अन्न हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.

या निमित्ताने अधिकधिक लोकांना कर्करोगाविषयी माहिती देऊन त्यांना त्या आजाराविषयी जागरूक करूया.

रक्तचाचणीनेही होणार कर्करोगाचे निदान
एखादी व्यक्‍ती आजारी पडल्यास डॉक्‍टर सर्वप्रथम रक्‍तचाचणी करायला सांगतात. कारण बहुतांश आजाराची माहिती ही रक्‍ताद्वारे कळते. मात्र, कर्करोगाचे निदान केवळ रक्‍ताच्या चाचण्यांद्वारे होत नव्हते. त्यासाठी इतर गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागत होत्या. मात्र, आता शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार फुफ्फुस व प्रोस्टेट कर्करोगाचे निदान रक्‍तचाचण्यांनी होणार आहे. यामुळे कर्करोगाचे निदान करण्यासाठी करावा लागणारा मोठा खर्च वाचू शकेल.

जगात सर्वाधिक बळी हे कर्करोगाने जात आहेत. मात्र, या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान करणे हे कठीण काम आहे. रक्‍तातील सेरम फ्री फॅटी ऍसिड आणि मेटाबोलिटीज या घटकांच्या आधारे कर्करोगाचे निदान होऊ शकते. यासाठी नवीन बायोमार्कर तयार केले आहे. या संशोधनासाठी फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या 55 रुग्णांचे आणि प्रोस्टेट कर्करोग झालेल्या 40 रुग्णांचे नमुने गोळा केले. तसेच कर्करोग नसलेल्या सर्वसामान्य व्यक्‍तींच्या रक्‍ताचे नमुने गोळा करून त्याचीही तपासणी केली. दुसऱ्या टप्प्यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया ठरलेल्या 24 रुग्णांच्या रक्‍तांचे नमुने घेतले. कर्करोग रुग्णांमध्ये सेरम फ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढलेले दिसले. तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर 24 तासांत सेरम फ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण तीन ते 10 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान रक्‍ताने झाल्यास विशेष अँटिजेन टेस्ट, बायोप्सीचा खर्च वाचू शकेल.

स्तनांचा कर्करोग आणि आहार !
स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या सुमारे 85 टक्‍के महिलांना कौटुंबिक इतिहास नसतो, लवकर निदान झाल्यास स्तनांच्या कर्करोगातून 98 टक्‍के महिला वाचू शकतात.

एक सकस आहार आणि जीवनशैलीतील बदल यांच्यामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका सुमारे 40 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकतो.

आहारामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो, असे दिसून आले आहे. योग्य आहार खाल्ल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते असे पुरावे मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहेत. काही आहार जसे तेलकट मासे (फोरेज फिश, सार्डिन, पेलाजिक इत्यादी) कर्करोगाच्या ट्यूमर्सच्या वाढीला आळा घालू शकतात तर इतर जसे हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे घटक असतात, जे कर्करोगाला कारणीभूत होणाऱ्या हार्मोन्सच्या वाढीला अटकाव करू शकतात.

आता आपण पाहूया महत्त्वाचे खाद्यपदार्थ जे तुमचे स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकतातः

टोमॅटो – टोमॅटो लायकोपिनने समृद्ध असतात (टोमॅटो तसेच अनेक बेरी आणि फळांमध्ये असलेला कॅरोटेनॉइड पिगमेंट) जो कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी सिद्ध झाला आहे. टोमॅटो स्तनांच्या कर्करोगासाठी उत्तम फळ ठरले असून ते उच्च अँटीऑक्‍सिडंट पातळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरले आहेत.

ग्रीन टी – यात शक्‍तिशाली अँटी ऑक्‍सिडंट्‌स असतात जे रक्‍तदाब कमी करू शकतात. व्हिटॅमिन सी चा जादा डोस त्यात टाकण्यासाठी लिंबू पिळा. त्यामुळे शरीरात अँटीऑक्‍सिडंट्‌स शोषून घेण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे दिसून आले आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्‌याने स्तनांचा कर्करोगाचा वेग कमी झाला आहे किंवा त्याला प्रतिबंधही झाला आहे.

हिरवी कडधान्ये – यात फोलेट्‌स, ब जीवनसत्त्व असते जे स्तनांच्या कर्करोगाला आळा घालण्यास मदत करते. अख्ख्या धान्यांपासून तयार केलेली उत्पादने जसे गहू, ब्राऊन राइस, मका, ओट्‌स, राई, बार्ली, नाचणी आणि ज्वारी हे सकस आहाराचा भाग आहेत. कारण ते जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, आहारातील फायबर आणि संरक्षण फायटोकेमिकल्सचे उत्तम स्रोत आहेत.

बीन्स आणि डाळी – बीन्स आणि डाळी तुमच्या आहारात भाज्यांच्या उत्तम प्रथिनांचा स्रोत आहेत आणि ते मसूर तसेच चणा यांच्यासारख्या बीन्स आणि डाळींमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्‍यता असते. ते कॅल्शियम, लोह आणि ब जीवनसत्त्वासारख्या पोषक घटकही देतात.

लसूूण – ऍलियम, लसूूण आणि त्याच्याशी संबंधित (कांदा, लिक्‍स, स्कॅलिस्स आणि चिव्ह्स) असे पदार्थ कर्करोगाशी लढा देण्यासाठी समृद्ध आहेत आणि ट्यूमरची वाढ कमी करून स्तनांचा कर्करोगाचा धोका कमी करतात तसेच कोलोरेक्‍टल व प्रोस्टेट कर्करोग अशा कर्करोगांनाही आळा घालतात.

गडद हिरव्या पालेभाज्या – अभ्यास आणि प्रयोगातून हे दिसून आले आहे की, काही रसायने तुमच्या शरीरातील डीएनएचे नुकसान होण्यापासून आळा घालतात आणि पेशी मृत होण्यापासून टाळल्या जातात, ज्यामुुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. कॅरोटेनॉइड्‌स अँटीऑक्‍सिडेंट्‌सचे काम करून कर्करोगाला आळा घालू शकतात- म्हणजे संभाव्य धोकादायक फ्री रॅडिकल्स शरीरातून धोका निर्माण करण्यापूर्वी नष्ट करतात.

  • डॉ. मेधा क्षीरसागर
Tags: aarogya jagar
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar