आपले दात हे हाडांमध्ये खोबणीत बसलेले असतात. या हाडाबाहेर जे गुलाबी रंगाचे मऊ आवरण असते. त्याला हिरडी असे आपण म्हणतो. हिरड्यांच्या रोगाचे प्रमाण भारतात सुमारे 70 ते 80 टक्के आहे. प्रत्येक 10 पैकी 8 लोकांना हिरडीचे रोग झालेले असतात. मुलांमध्ये विशेष करून हिरडीचे रोग होत नाहीत. पण मोठेपणी या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
काय आहे टार्टर?
आपण खाल्लेल्या पदार्थाचे अन्नकण, तोंडात असलेले जंतू व लाळेत असलेले खनिज पदार्थ (विशेषतः कॅल्शियम) यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन एक साका तयार होतो. हा साका हिरड्या व दात यामध्ये साठून राहतो व दगडाप्रमाणे घट्ट होतो. यालाच किटण किंवा टार्टर असे म्हणतात. या किटाणूचे थर सतत वाढत जातात. या वाढलेल्या थरामुळे हिरड्या व त्या खाली असलेले हाड झिजत जाते.
काय आहे पायोरिया?
हिरडी व दात यांच्यामध्ये पोकळी तयार होऊन त्यामध्ये परत जंतू व अन्नकण अडकून बसतात. या जंतूंच्या प्रादुर्भावामुळे या पोकळीत पू तयार होतो. यालाच पायोरिया असे म्हणतात. यामुळे हिरड्या लिबलिबीत होतात. त्यांना सूज येते. हिरड्यांमधून रक्त येते व तोंडाला दुर्गंधी येते. हिरड्या व हाड सारखे झिजत राहिल्यामुळे दातांचा आधार जातो व दात निखळून पडायला सुरुवात होते. दात वेडेवाकडे असल्यास दात स्वच्छ न ठेवल्यामुळे व दातांच्याच एकमेकांवर पडणाऱ्या अवाजवी दाबामुळेसुद्धा प्रत्येक घासाबरोबर पोटात जातो व सबंध शरीराचे आरोग्य बिघडवतो. त्यामुळे हिरड्यांची निगा घेणे हे दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दात कसे घासावे?
1. दात योग्य प्रकारे ब्रश केल्यामुळे दातांभोवती अन्नकण साठणार नाही. त्यामुळे किटण होण्यास आळा बसेल व किटण तयार होत असेल तर ते दगडाप्रमाणे घट्ट होण्याच्या आधीच ते ब्रशने काढले जाईल. दरवेळी खाल्ल्यानंतर योग्य प्रकारे ब्रशने दात स्वच्छ केल्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यास प्रतिबंध होईल.
2. दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण निघण्यासाठी ब्रश हातात आडवा न फिरवता वरून खाली किंवा गोल फिरवणे उत्तम. अशाप्रकारे ब्रश फिरवण्यामुळे हिरड्यांचा व्यायाम होतो व त्या निरोगी राहतात. दात घासल्यानंतर बोटाने हिरड्यांना मसाज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिरड्यांना योग्य तो व्यायाम मिळतो, तसेच हिरड्यामधील रक्ताभिसरण वाढल्यामुळे निरोगी राहून रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
3. हिरड्यांच्या रोगाचे मूळ कारण असे जमा होणारे किटण वेळोवेळी दंत वैद्यांकडे जाऊन काढणे (दात स्वच्छ करणे) अत्यंत जरुरी असते. हे किटण सर्वांच्याच दातांवर जमा होत असते. फक्त काही (आपले दात अधिक सुंदर, अधिक बळकट कसे करता येतील?) व्यक्तींमध्ये ते जास्त प्रमाणात तयार होते इतकेच.
4. हिरड्यांच्या रोगांची सुरुवात झाली की त्याचा त्रास होईपर्यंत 10-15 वर्षे लागतात. केव्हा त्रास होऊ लागतो तेव्हा दात काढण्याची स्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे वेळोवेळी दंत वैद्यांचा सल्ला घेतल्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यापासून थांबवता येईल. दात स्वच्छ केल्यामुळे कसलाही अपाय होत नाही.