[[{“value”:”
Brain eating amoebic infection: केरळमध्ये ‘अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस’ (Brain Eating Amoeba) या दुर्मिळ पण धोकादायक आजारामुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव कोझिकोड आणि त्याच्या आसपासच्या भागात झपाट्याने वाढताना दिसतो आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि पाण्याशी संबंधित खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नवा बळी
मलप्पुरम जिल्ह्यातील शाजी (वय 47) यांचा कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही या आजारामुळे मलप्पुरम जिल्यातील एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
दूषित पाणी हे प्रमुख कारण
तज्ज्ञांच्या मते, हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यातील नेगलेरिया फाउलेरी अमीबामुळे होतो. पाण्यात डुबकी मारताना दूषित पाणी नाकावाटे शरीरात गेल्यास हा अमीबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूचे ऊतक नष्ट करतो. त्यामुळे रुग्णाची स्थिती लवकरच गंभीर होते आणि मृत्यूची शक्यता वाढते.
सध्याची परिस्थिती
कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या या आजाराचे 10 रुग्ण उपचार घेत आहेत.राज्य सरकारने उत्तर जिल्ह्यांमध्ये कुंड, विहिरी आणि तलावांचे क्लोरीनीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.जुलैपासून या आजाराचे अनेक रुग्ण समोर आले असून प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे.
लक्षणं कोणती?
सुरुवातीला हा आजार साध्या फ्लूसारखा वाटतो.डोकेदुखी, ताप, उलटी, मळमळ, मेंदूत सूज ही लक्षणे वेगाने वाढत जातात आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.
मागील घटना
मागील महिन्यात (16 ऑगस्ट) कोझिकोड येथे या आजारामुळे नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही केरळ मध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळले होते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दूषित पाण्याचा वापर टाळावा, पाण्यात डुबकी मारताना काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
The post Brain eating amoebic infection: केरळमध्ये ‘ब्रेन ईटिंग अमीबा’चा वाढता धोका; सहा जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat.
“}]]
