गरोदर महिलांना रक्तक्षयाचा धोका जास्त असतो. खरंतर गरोदरपणात सौम्य रक्तक्षय असणे सर्वसामान्य आहे. पण जर या रक्तक्षयाची तीव्रता वाढली, तर आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. गरोदरपणात लोह आणि इतर पोषकतत्वे आहारात पुरेशा प्रमाणात न घेतल्यास आपले शरीर लाल रक्तपेशी योग्य प्रमाणात तयार करू शकत नाही. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे वहन योग्य प्रकारे होत नाही.
ही महिलांना प्रसूतिनंतरदेखील रक्तशयाचा त्रास असू शकतो. याला प्रसूतिनंतरचा रक्तक्षय असे म्हणतात. प्रसूतिनंतरच्या एका आठवड्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण 11% पेक्षा कमी आणि आठ आठवड्यांनंतर 12% पेक्षा कमी राहिल्यास रक्तक्षय दीर्घकालीन समजला जातो. प्रसूतिनंतर महिला बाळाची काळजी घेण्यात गढून जातात आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात हे त्यामागचे कारण असल्याचे आरोग्यक्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
हा सगळा लेखनप्रपंच करण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे नुकतीच एक तरूण वयातील आई सारखा थकवा येतो अशी तक्रार घेऊन आली होती.
रक्तक्षयाच्या पायऱ्या
तेवीस वर्षांची मैथिली माझ्या क्लिनिकमध्ये आली ती प्रचंड प्रमाणात येणाऱ्या थकव्याची तक्रार घेऊनच. मैथिलीला सहा महिन्यांचे बाळ होते आणि ती पुन्हा गरोदर होती. क्लिनिकमध्ये आल्या आल्या तिने विचारले, “आपण बोलणे सुरू करण्याआधी मी पाच मिनीटे बसू का?’ विशीतली असूनही तिला इतका थकवा आलेला पाहून मी आश्चर्यचकित झाले पण मी जरावेळ शांत राहिले. तिने थोड्या वेळाने बोलायला सुरुवात केली. “बरेच दिवस झाले मला असा थकवा येतोय, मला कळतच नाहीये मला काय झालंय ते!
मला तिच्या डोळयाखालची डार्क सर्कल्स दिसत होती आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत होत्या. माझ्या लक्षात आले की, केवळ लहान बाळाची काळजी घेऊन इतका थकवा यायचे कारण नाही.
पहिली पायरी
तिचा चेहरा फिकटसा झाला होता आणि रक्तक्षयाची लक्षणे मला तिच्यात दिसत होती. तिने रक्तक्षयाची पहिली पायरी – लेटन्ट आयर्न डेफिशिअन्सी (एलआयडी) केव्हाच ओलांडली होती. या पायरीमध्ये हाडांच्या मध्यभागातला लोहाचा साठा कमी व्हायला लागतो आणि शरीरातील एकूणच लोहाचे साठे कमी-कमी व्हायला लागतात.पण या काळात थोडा थकवा आणि उत्साहाची कमतरता सोडल्यास इतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
दुसरी पायरी
दुसऱ्या पायरीमध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते. यामुळे रक्तातील ट्रान्सफेरीन नावाच्या प्रथिनाची पातळी वाढते. हे प्रथिन यकृतामध्ये तयार होते आणि आहारातून शोषल्या गेलेल्या लोहाला सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवते. या पायरीमध्ये रक्तद्रव्यातल्या लोहाचे प्रमाणही थोडे कमी होते आणि थकवा वाढायला लागतो.
तिसरी पायरी
तिसऱ्या पायरीमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी व्हायला लागते. पण लाल रक्तपेशींचा आकार, स्वरूप आणि रंग बदलत नाही.
चौथी पायरी
मैथिलीकडे बघून मला खात्री पटली होती की, तिला चौथ्या पायरीतला रक्तक्षय आहे. या पायरीमध्ये हिमोग्लोबिनची पातळी तर कमी होतेच, शिवाय गरगरणे, थकवा येणे, एकाग्रता नसणे, पायात गोळे येणे, डोकेदुखी, पांदुरकी त्वचा आणि धाप लागणे अशी लक्षणे दिसून येतात. याची पडताळणी रक्ताच्या तपासण्यांमधून सहज करता येते.
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
हा सर्वाधिक आढळून येणारा रक्तक्षयाचा प्रकार असून भारतातले जवळपास 33% पुरुष आणि 89% स्त्रिया या प्रकारच्या रक्तक्षयाने ग्रस्त आहेत. लोह हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे खनिजद्रव्य. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची आवश्यकता असते. हिमोग्लोबिन हे प्रथिन आपल्या फुप्फुसांकडून ऑक्सिजन घेऊन शरीरात इतरत्र पोहोचवते. जेव्हा लोहाची कमतरता असते, तेव्हा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन शरीर लवकर थकते आणि प्रतिकारशक्तीदेखील कमी होते. लिव्हर (कलेजा), सोयाबिन, शेंगवर्गीय भाज्या व डाळी यांमध्ये लोह असते.
फोलेटच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
फोलेट हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असून ते मुख्यत्वे करून प्राणिज पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, केळी यांमध्ये आढळते. शरीरात नवीन पेशी आणि रक्तपेशी तयार करण्यासाठीही फोलेट मदत करते. गरोदरपणात शरीरात जास्त प्रमाणात रक्तपेशी तयार कराव्या लागत असल्यामुळे आणि बाळाच्या विकासनासाठी फोलेटची गरज वाढते. त्यामुळेच फोलेटची कमतरता वेगवेगळ्या जन्मजात दोषांशी निगडीत असते. उदा. न्यूरल ट्यूबचा दोष, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे इ.
जीवनसत्व ब-12 च्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
जीवनसत्व ब-12 हे सुद्धा लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. मुख्यत्वे करून मांसाहारी पदार्थांमधून (चिकन, मटण, मासे इ.) जीवनसत्व ब-12 मिळते. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींमध्ये या जीवनसत्वाची कमतरता आढळते. गरोदर महिलांमधील ब-12 ची कमतरता न्यूरल ट्यूबचा दोष, आणि मुदतपूर्व प्रसूति यांच्याशी संबंधित असते.
रक्तक्षयाची कारणे
हे सगळे समजून घेऊन मैथिलीने मला पुढे विचारले, “मॅडम, याची नेहमी दिसून येणारी कारणे कोणती?’ माझ्या लक्षात आलेच होते की, तिला रक्तक्षयाच्या सगळ्या कारणांबद्दल माहिती देणेही आवश्यक आहे. मी तिला सांगायला सुरुवात केली…
आहारात लोह आणि फोलिक ऍसिडचे प्रमाण कमी असणे, गरोदरपणात आणि प्रसूतिनंतर योग्य सप्लिमेंट्स न घेणे. प्रसूतिदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव होणे: यामुळे शरीरातील लोहाचे साठे कमी होतात आणि रक्तक्षय होतो. पचनसंस्थेशी संबंधित काही आजार उदा. सिलिऍक डिसिज, क्रो डिसिज – यामध्ये लोहाचे शोषण कमी होते.
गरोदरपणात अतिरिक्त उलट्या होणे
गर्भधारणेपूर्वीच रक्तक्षयाने ग्रस्त असणे
एकापेक्षा जास्त गर्भ असणे (उदा. जुळे/तिळे)
दोन गरोदरपणांमध्ये पुरेसे अंतर नसणे
काही जंतुसंसर्ग उदा. मलेरिया, एच.आय.व्ही.
रक्तक्षयाचा प्रतिबंध आणि उपचार
कारणे सांगितल्यानंतर आता वेळ होती हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय काय करायला हवे हे सांगण्याची. आणि माझा पहिला सल्ला होता, आहारातील लोहाचे प्रमाण वाढवणे आणि आहारात जीवनसत्व ब-12 व फोलेटचा समतोल साधणे, या गोष्टी तर प्रत्येकानी कराव्यात अशाच आहेत.
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा
चिकन, मटण, मासे
अंडी
सुकामेवा व तेलबिया
हिरव्या पालेभाज्या
डाळी, कडधान्ये, टोफू
आहारात क जीवनसत्वाचा समावेश करावा (आहारात क जीवनसत्वाचा समावेश केल्यास लोहाचे शोषण 10 ते 12 पटींनी वाढते)
लिंबूवर्गीय फळे आणि त्यांचे रस
स्ट्रॉबेरीज
किवी फ्रुट
टोमॅटो
चहाचे सेवन टाळावे
चहामधील टॅनिन नावाचा घटक लोहाचे शोषण कमी करतो. कॅल्शियमचे अतिसेवनदेखील लोहाचे शोषण कमी करते.
आहारात भरपूर द्रवपदार्थ घ्यावे
रोज कमीतकमी चार लिटर पाणी घेणे चांगले. यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचे प्रमाण चांगले रहाते, प्रसूतिनंतर रक्तप्रवाह सुधारतो, रक्तात गुठळ्या होण्याची व लघवीच्या जागी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते. लोहाच्या सप्लीमेंट्समुळे बद्धकोष्ठता, गॅसेस असे त्रास होऊ शकतात, जे पुरेशा द्रवपदार्थांच्या सेवनाने कमी होतात.
बद्धकोष्ठता टाळावी
बद्धकोष्ठता हा रक्तक्षयाचा परिणामदेखील आहे. हे टाळण्यासाठी देखील आहारात भरपूर द्रवपदार्थांचा समावेश करावा.
पुरेशी विश्रांती घ्यावी.
लोहाच्या कमतरतेमुळे जर थकवा येत असेल तर पुरेशी विश्रांती घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणेपूर्वी आणि नंतर योग्य ती लोह, फोलिक ऍसिड आणि जीवनसत्वे असणारी सप्लीमेंट्स घ्यावीत. शाकाहारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असल्यास जीवनसत्व ब-12 घ्यावे.
डॉ. मानसी पाटील