पुणे – आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
म्हणून लावतात कपाळावर चंदन –
कपाळावर दोन भुवयांमध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते. या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक ऊर्जा स्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते. तसेच, चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
चायनिज अॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होते.
जेव्हा ताप येतो तेव्हा गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्याने ताप कमी होण्यास मदत मिळते. हेच काम चंदनाचा लेप देखील करतो. ताप आला असल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावावा. यामुळे अंगातील उष्णता कमी होते, व शरीराचे तापमान कमी होऊन ताप उतरतो.
तिसर्या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र, चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते. चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.